मुंबई : भारत फोर्जमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची सांगता झाली. भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा एन. कल्याणी यांनी सर्व सहभागी सदस्यांच्या प्रयत्नांचे व सांघिक कार्याचे कौतुक केले.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन, एनजीओ, शाळा, आयटीआय, ग्राम विकास संघ, ग्रामपंचायत सदस्य व कल्याणी ग्रुप कंपन्यांचे कर्मचारी यांना अॅप्रिसिएशन सर्टिफिकेट देण्यात आली. या उपक्रमासाठी सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल स्थानिक नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला.
‘स्वच्छता ही सेवा’ १५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०१८ या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ या राष्ट्रीय उद्दिष्टाप्रती सुरू केलेले अभियान आहे. स्वच्छ व शाश्वत समुदाय निर्माण करण्याचे उद्दिष्ट असलेली एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून भारत फोर्जने राष्ट्रीय अभियानाच्या समर्थनार्थ ही वाटचाल सुरू केली. या अभियानाचा भाग म्हणून भारत फोर्जने जागृतीपर रॅली, दारोदार कॅम्पेन, आसपासच्या भागाची, शाळांची, समुदायांची व गावांची स्वच्छता व सुशोभीकरण या तीन मुख्य क्षेत्रांत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले होते.
‘स्वच्छता ही सेवा’अंतर्गत भारत फोर्ज एक लाख ५४ हजारांहून अधिक व्यक्ती, ३२ गावे, १३७ समुदाय, ३२ हजार ६५० घरे व ४७ शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचली. स्वच्छता राखण्यासाठी आणि शाळा व स्थानिक सामाजिक स्तरावर स्वच्छताविषयक विविध स्पर्धा आयोजित करण्यासाठी समित्यांची स्थापना करून ही मोहीम यापुढेही सुरू ठेवली जाईल.
भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा एन. कल्याणी व महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलेल्या जागृती रॅलीने १५ सप्टेंबर २०१८ रोजी भारत फोर्जमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची सुरुवात झाली. त्यानंतर एकूण ४० जागृती रॅलींचे आयोजन केले व स्वच्छ पर्यावरणाचे महत्त्व सांगण्यासाठी व स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी त्यामध्ये १६ हजार ७५० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. या रॅली आसपासच्या समुदायांमध्ये, दत्तक घेतलेल्या पालिका व जिल्हा परिषद शाळांमध्ये, आयटीआय, दत्तक घेतलेल्या गावांमध्ये आणि भारत फोर्ज व कल्याणी ग्रुप कंपन्यांच्या आसपास आयोजित करण्यात आल्या.
स्थानिक परिसराची स्वच्छता करण्यात आली आणि विशिष्ट परिसरांमध्ये वॉल पेंटिंग व वृक्षलागवड करून सुशोभीकरण करण्यात आले. स्वच्छता मोहिमेमध्ये अंदाजे चार हजार ६०० लोक सहभागी झाले आणि ‘स्वच्छता ही सेवा’अंतर्गत अंदाजे ८०० झाडे लावण्यात आली. दारोदार अभियान, शाळांमध्ये जागृतीपर सत्रे व पथनाट्ये याद्वारे स्वच्छतेविषयी जागृती करण्यात आली. अंदाजे २०० स्वयंसेवकांनी स्थानिक स्तरावरील शाळा, आयटीआय व घरे यांना भेट दिली आणि स्वच्छता, चांगल्या आरोग्याच्या व स्वच्छतेच्या सवयी, कचरा व्यवस्थापन व कचऱ्याचे विभाजन याविषयी जागृती करण्यात आली.